तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Sangvi Bhet cm

। अक्कलकोट : प्रतिनिधी
नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वार्‍यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर दिला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, ना.विजय वड्डेटीवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार प्रणिती शिंदे, माजी आ.सिध्दाराम म्हेत्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, तालुका प्रमुख संजय देशमुख, राष्ट्रवादीचे ता.अध्यक्ष दिलीप सिध्दे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव आषिश कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रामपूर येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष पडझड झालेल्या घरात जाऊन नागरिकांना दिलासा दिला. शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची, पशुंच्या जीवांची काळजी घ्यावी. शासन तुमची काळजी घेईल, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल.
रमेश बिराजदार हा शेतकरी तब्बल 24 तास झाडावर आणि पाण्यात होता. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी त्यांना बाहेर काढले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रमेश बिराजदार यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. उपचार घेतले का, तुम्हाला आता काही त्रास होतोय का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर शेतकर्‍याला अश्रू अनावर झाले होते. रडत रडतच त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
यावेळी नुकसानग्रस्त रमेश बिराजदार, लक्ष्मण कोणदे, शोभा बिराजदार, नागेंद्र बिराजदार, चन्नव्वा वाघमारे यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोरी नदीची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाची त्वरित डागडुजी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तहसीलदार अंजली मरोड यांनी पूरग्रस्त आणि बाधित झालेल्या कुटुंबांची माहिती दिली. रामपूर गावातील 50 टक्के रहिवाश्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी बोरी नदीला पूर आल्याने 40 घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेकडो एकर शेतीचेही नुकसान झाले आहे. बोरी नदीवरील पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यात शेतकर्‍यांची सात जनावरे वाहून गेल्याने दगावली आहेत. तुरीच्या आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहितीही श्रीमती मरोड यांनी दिली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड, अक्कलकोट बाजार समितीचे उपसभापती अप्पासाहेब पाटील, जि.प. सदस्य आनंद तानवडे, सरपंच शोभा बिराजदार, उपसरपंच रोहिणी फुलारी, माजी सभापती संजीवकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य आनंदराव सोनकांबळे, गटविकास अधिकारी महादेव कोळी, पोलीस पाटील शिवानंद फुलारी, ग्रामसेवक शिवशरण धड्डे, दिलीप सिद्धे आदींसह परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
अक्कलकोट तालुक्यात महापूराचा तडाका बसल्याने नदीकाठच्या गावच्या नागरिकांचे घर, शेती, कुटूंब यांचे पूर्णपणे वाताहात झाले होते. या निमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी धावती भेट घेतली. मात्र हे दौरा देखावा ठरु नये असे सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.

अक्कलकोट तालुक्यात आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात महापूरामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात हानी झालेल्या शेतकर्‍यांचे शेती कुटूंब याचा पूर्णपणे वाताहात झालेला आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे नुसते पाहणी दौरा होऊ नये, शेतकर्‍यांना आधार देणारा व्हावा, शेतकर्‍यांचे झालेले नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन जास्तीत जास्त मदत जाहीर करावी.
आमदार सचिन कल्याणशेट्टी, अक्कलकोट

About Author